Sunday, 31 December 2017

नवं स्वागत_नवं प्रेरणेचे

तसे तर येणारा प्रत्येक दिवस नविन व प्रत्येक नवीन क्षण चैतन्याने भरलेला, असं मानणाऱ्या संस्कृतीत व समाजात मी वाढलेलो असल्यामुळे नवीन दिवसाचे किंवा वर्षाचे  स्वागत त्यातल्या त्यात इंग्रजी नवीन वर्षाचे स्वागत करण्यात मला फार काही रस वाटत नाही, पण कोठून तरी सुरवात असावी आणि कोठे तरी अंत किंवा समाप्ती म्हणून हे परिमापक मान्य केल्यास येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करणे जरुरीचे वाटते. तस मी काही फार मोठा किंवा प्रसिद्ध व्यक्ती नसल्यामुळे सरत्या वर्षांचा हिशोब मांडणे व येणाऱ्या वर्षाचे उद्दिष्ट ठरवणे असे काही नाही पण एक छोटासा प्रयंत्न सरत्या वर्षाकडून आपल्याला काय मिळाले याचा व येणाऱ्या नवीन वर्षा कडून अपेक्षा मांडण्याचा प्रयंत्न करण्यास काय हरकत आहे. २०१७ हे नाविन्याची भरलेले वर्ष होते असे म्हणता येईल, आठवणींची उजळणी करणे हे उद्दिष्ट नाही पण झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वार्षिक विश्लेषण करावे असे वाटते. घरात बसल्यावर एकट्याने दिवस भराच्या घटनांचा पाढा वाचला म्हणजे कळते दिवस कसा गेला आणि रात्री झोप ही निवांत लागते, त्या प्रमाने जीवनात काही वेळा किंवा ठरावीक अंतरा वरून आयुष्याची उजळणी करण्यास काहीच हरकत नसते. 

वर्षभरतील काही घटनां प्रचंड आशादायी व ऊर्जाने भरलेल्या असतात तर काही निराशादायक असतात. ज्या ऊर्जादायी घटना असतात त्यातून प्रचंड प्रेरणा मिळते व त्या त्या क्षेत्रात काम करण्याची उत्सुकता वाढते मात्र निराशाजनक घटनांचा परिणाम स्वतःवर होऊ न देणे हे खरी कसोटीचे असते. खूप वेळा असे दिसून येते की ज्या नकारार्थी घटनां असतात त्यांचा परिणाम जास्त आणि लवकर दिसून येतो पण तो अल्प काळचा असतो तर आशादायी घटनांचा परिणाम दीर्घकाळ असतो मात्र सावकाश दिसून येतो. सरत्या वर्षातून आशा मोजक्याचं आशादायी घटनांची शिदोरी घेऊन नकारार्थी घटनांना, विचारांना मूठ-माती देऊन नवीन वर्षात प्रवेश करणे म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत असू शकते. 

फुलांचा गुच्छ घेऊन, रात्री बारा वाजता दरवाजा उघडून कोणचे स्वागत करणार ??? रात्रीच्या प्रचंड काळोखाचे !!! की उगवत्या सूर्यातुन येणाऱ्या चैतन्यदायी व नवं-आशादायी सूर्य किरणांचे !!! हे ठरवणे आपल्या हातात आहे. सरत्या वर्षातील आशादायी व प्रेरणादायी घटनां मी पहाटेच्या नवं-किरणांच्या साक्षीने नवीन वर्षात आणल्या आहेत, आणि ध्येयं प्राप्ती करीताची हीच शिदोरी असू शकते.  


धन्यवाद                                            विराज

Sunday, 17 December 2017

वेळमावस्य....!!! ग्रामीण मराठवाडा ते ग्लोबल मराठवाडा


मार्गशीष अमावस्या म्हणजेच दर्शवेळ किंवा येळमावस्य दर वर्षी हा दिवस डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात येतो. तसे ही साधी अमावस्या पण मराठवाड्यातील काही भागात म्हणजे लातूर उस्मानाबाद जिल्यात आणि कर्नाटकाच्या काही भागात हा दिवस खूप उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागातला उत्सव असल्यामुळे शेतीशी संबंध आलाच, हिवाळ्याचे दिवस मराठवाड्यात या दिवसात बोचरी थंडी असते, वर्षभर तसे तापमान जास्त असलेला हा भाग त्यामुळे ही बोचरी थंडी सुद्धा सुखावह असते, त्यात खरिपाची जवळ जवळ सर्वच पीक हातात आलेले असतात, रब्बीची सुद्धा पेरणी झालेली असते अशा वेळी क्षणभर विश्रांती या वेळी हा उत्सव साजरा केला जातो.  शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेतात जाऊन हा उत्सव साजरा करतात, शेतातील रम्य परिसर, रब्बीचे पिके मग गहू, ज्वारी, हरबरा फळ पिके पेरू,बोर, चिंचा, सीताफळ, डाळींब, ऊस या सगळंनी शेती बहरलेली असते. पोहण्याचा मनसोक्त आनंद मग विहरीत असे किंवा नद्यांत (सध्या मराठवाड्यात पाऊस काळ चांगला झाला आहे) उबदार सूर्य प्रकाश आणि थंड हवा यामुळे वातावरण आनंदी आणि प्रफुल्लित होते. मुख्य कार्यक्रम साधाच असतो छोटीशी शेतातील पूजा आणि त्यानंतर वन भोजनाचा आस्वाद असतो. 
हे भोजन पूर्णपणे शेतात तयार केले आणि जास्तीत जास्त शेती उत्पादनाचा वापर केलेला असते. सहसा शाकाहारी जेवन असते पण मांसाहार सुद्धा आवडीनुसार असू शकतो. एक प्रकारे कृतज्ञ: सोहळा असतो शेती बद्दलचा. शेतकरी आपल्या जवळचे नातलग-मित्रपरिवार घेऊन त्याच्या शेतात ग्रामीण संमेलन साजरे करत असतो. पारंपारिक वेशभूषा, लोककला, आणी ग्रामीण जेवणाचा आनंद लुटत असतो. ज्यातून तो गेल्या सहा महिन्यातील त्याच्या कष्टाचे प्रदर्शन तर मांडतोच पण यातून कृषी पर्यटनाला सुद्धा वाव मिळतो. 



कृषी प्रधान देशात कृषी पर्यटन आणि उत्सव (agritourism & event) हे ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्याचे चांगले साधन आहे. मुळात आज भारत सारख्या देशात शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे पण त्यातून मिळणारे उत्पन्न तसे तोकडे म्हणून आज कृषी क्षेत्रा कडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज निर्माण झाली आहे. कृषी उत्पादनास थेट बाजारात नेण्या एवजी त्यावर प्रक्रिया करून बाजारात आणणे व योग्य विपणन करणे(Marketing) गरजेचे आहे. त्याच बरोबर या प्रक्रिया उत्पादनंचे merchandising सुद्धा जरुरीचे आहे आणि वेळमावस्य सारख्या कृषी पर्यटन उत्सवातून हे सद्य होऊ शकते. कोकणातील पोफटी पार्टी, जळगांव खान्देशातील शेव भाजी -वांग भरीत पार्टी, हुरडा पार्टी या सारख्या ग्रामीण उत्सवातून कृषी अर्थव्यवस्थेची प्रगती होऊ शकते. agritourism करता या Rural event फार फायदेशीर ठरू शकतात.