Wednesday, 7 March 2018

पुतळ्याचे आत्मवृत्त

राणीच्या बागेत किंवा कुठल्याशा पार्कात मध्यभागी पडून असलेला मी, म्हणाल तर निर्जीव पण सजीवात प्राण फुकण्याची क्षमता असलेला मी, तस या "मी" ला नाव सुद्धा आहे पण नाव आलं की जात येते, जात आली की धर्म येतो, धर्म आला की भाषा येते आणि हे तिघे आले की या तिघांची मिळून अस्मिता येते म्हणून नको आज नाव नकोच. नाव घेतला की मग बोलताना सुद्धा अडचण येते. कारण तेथून पुढच्या प्रत्येक शब्दात या तीन गोष्टी शोधल्या जातात, म्हणून आज फक्त पुतळा. तस फार काही माझं अस्तित्व नसत म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाने मला बसवलंजात त्याचच काय ते अस्तित्व असत मी नाम मात्र असतो. काही जण म्हणतात मी त्यांच्या करता प्रेरक असतो, पण ते मला नाही खरं वाटत. 

बाकी आमचा सुद्धा खूप मोठा समाज आहे बरं का !! जेवढे समाजात व्यक्ती(माणसं) तेवढे पुतळे, एका माणसाचा एक असं काहीस असत. कधी आम्ही रस्त्याच्या मधो-मध असतेत तर कधी रस्त्यावर कोपऱ्यात असतेत, कधी पार्कात असतेत तर कधी ऐतिहासिक वस्तू मध्ये असतेत, कधी कोणाच्या समाधीवर असतेत तर कधी इस्पितळात असतेत, एकूण म्हणजे आमचे असण्याचे ठिकाण खूप आहेत असं एक विशिष्ट ठिकाण नाहीच हो! सर्वत्र आम्ही आहोत. आमचा वर्ण सुद्धा आहे बरं का !! म्हणजे काही पुतळे हे काळ्या पाषाणातले असतात आणि खूप ओबडधोबड असतात असे खालच्या वर्गातले पुतळे आहेत तर काही मेणा पासून बनवलेले पुतळे आहेत ते फार नाजूक असतात ते तर AC शिवाय कुठे राहातच नाहीत. बाकी बहुतेक पंच धातुचे असतात माझा सारखे. काही सोनं-चांदीचे ही असतात पण ते तिकडं फॉरेनात आपल्या इकडं नाही. काही पुतळे पूर्णाकृती असतात, काही कमरे पर्यंत असतात तर काही छाती पर्यंत असतात. खरं तर पुतळ्याला सुद्धा बजेट असते  आमच्यात, जस बजेट तसा पुतळा. काही श्रीमंत पुतळे असतात तर काही गरीब पुतळे असतात. राजकीय भाषेत बोलायचं तर काही कॅप्टलिस्ट असतात तर काही कम्युनिस्ट असतात. 

तस आम्ही समाजतले निरुपयोगीच जो व्यक्ती हयात नाही त्याची आकृती म्हणून आम्ही समाजात वावरत असतेत. आम्ही कोणाला बोलू शकत नाहीत आणि ऐकायचं म्हणाल तर आम्हाला ऐकू येत, मी तर खूप मज्जा घेऊन ऐकतो कोणाला बोलू नका हं !! पण चोरून ऐकण्यात वेगळीच मज्जा असते. जे रस्त्यावरती असतात ना त्यांना गाडीच्या भोंग्या शिवाय काही ऐकू येत नाही पण माझ्या सारख एखाद्या बगीच्या मध्ये असणाऱ्यांची मज्जच काही और असते. माझा पाप-पुण्यावर विश्वास यामुळेच आहे, कारण मागच्या जन्मी मी खरंच काही पुण्य केलं असेल म्हणून मी पुतळा बनून बगिच्यात आलो. बगिच्यात असल्यामुळे गुलु-गुलु बोलणं  ऐकण्याच्या खूप संधी येतात, मज्जा असते दोन प्रेमी युगलकांचे संवाद ऐकण्याची, कधी रुसवे फुगवे असतात तर कधी भांडण असतात. माझाच खाली पायरी वरती येऊन दोघेही बोलत बसतात. कधी नवं विवाहित असतात तर कधी वृद्ध असता पण संवाद मात्र सुख-दुःखाचाच असतो. ते दोघे बोलताना एकमेकांच्या मनातला बोलत असतात पण न कळत ते माझा ही मनात घर करून बसतात.

आमच्या पैकी बहुतेक पुतळे सुखी असतात, पण बगिचातल्या पुतळ्याचं दुःख फक्त चिमण्या कावळ्या मुळेच असते. खरे दुखी रस्त्यावरचे पुतळे असतात  धूळ धूर गाड्यांच्या भोंग्याचा आवाज हे तर त्यांच्या दुःखाचे कारण आहेच पण त्यांचे अनुयायी सुद्धा खूप दुःख देतात बिचार्यांना. हार-तुरे मान-सन्मान खूप मिळते पण उन्हाचे चटके ही खूप सोसावे लागतात. पावसाचे पाणी आणि थंडित हवा सुद्धा खूप झोंबते. अनुयायांचे प्रेम आणि विरोधकांची टीका हे त्या व्यक्तीमुळे असते पण भोगावे पुतळ्याला लागते आणि हेच त्याचे वर्तमान असते.  

असो पुतळा होण्याचं एकच खूप मोठं दुःख आहे, आयुष्य ज्या माणसाने अन्याया विरुद्ध लढण्यात घालवले तोच मृत्यू नंतर डोळ्या समोर अन्याय होत असताना पुतळा बनून उभा असतो. 

धन्यवाद    

(टीप: कृपया हे लक्षात घ्यावे की हे पडक्या पुतळ्याचे आत्मवृत्त नाही फक्त पुतळ्याचे आत्मवृत्त आहे) 

1 comment: