Sunday, 5 February 2023

भूपाळी

 

सकाळी सकाळी लता दीदींनी रियाज सुरु केला आणि देवांना कळून चुकलं कि लता मंगेशकर स्वर्गात आल्या, " उठा उठा हो सकळीक" या दीदींच्या आवाजातील भूपाळी ने सगळ्या देवांची त्यादिवशी सकाळ झाली. स्वतः लता मंगेशकर स्वर्गात आल्या म्हटल्यावर प्रत्येक देवाला दीदींच्या स्वरातून गाणे ऐकण्याचा मोह झालाच होते, पण सुरवात कोणा पासून होणार हा प्रश्न होता. नारद मुनींनी "नारायण-नारायण" म्हणत श्री विष्णू च्या दरबारात हजेरी लावली, त्यावेळी भगवान शांत चित्ताने चिंतनात शेषनागावरती विराजित होते, माता लक्ष्मी त्यांचे पाय चेपत होती. नारद मुनींच्या आवाजाने भगवंताचे चिंतन भिंगले व ते हसत नारद मुनींना म्हणाले, "आज एवढ्या सकाळी-सकाळी विष्णू लोकात कसे काय येणे केले नारद मुनी तुम्ही?", नारदांनी भगवंतांना नमस्कार करत म्हणाले " भगवंता, आज सकाळच्या भूपाळीचा स्वर तुमच्या कानी आलाच असेल !" नारदांच्या या वाक्यावर भगवंतांनी स्मित हास्यकरत मान डोलावली आणि म्हणाले " हो, नारदा, तो भूपाळीचा स्वर्गीय स्वर माझ्या कानी आला आणि मला कळले लता स्वर्गात आली", त्यावरती माता लक्ष्मीने नारदांकडे पहात प्रति प्रश्न केला, "पण तुम्ही हे विचरण्याकरिता विष्णू लोकात आलात?" त्यावर नारद मुनी माता लक्ष्मी ला नमस्कार करत म्हणाले, "नाही माते, मला हे माहित आहे भगवंतांना चरा चराची माहिती आहे, पण लता दीदी स्वर्गात आल्या आहेत तर आम्हाला श्री विष्णूची स्तुती त्यांच्या स्वरात कधी ऐकायला मिळेल हे विचारायला आलो आहे?" नारदांच्या या प्रश्ना वरती माता लक्ष्मी ने भगवंता कडे पहिले तेव्हा भगवांताच्या चेहऱ्यावरती तेच निरागस स्मित होते आणि भगवंत डोळे मिटून चिंतनात रमले होते. भगवंताच्या चेहऱ्यावरील स्मित हास्याचा अर्थ नारदांना समजला नाही, मात्र ते पाहून नारदांनी कैलासाची वाट धरली.

कैलासावर भगवान शिव ध्यानस्त मुद्रेत बसले होते, माता पर्वती शेजारी विराजमान होत्या, समोर नंदी हात जोडून उभे होते. नारद मुनी कैलासावर नारायण नारायण चा जप करत पोहंचले आणि भगवान शंकरच माता पार्वतीला म्हणाले, " आज नारद विशेष प्रयोजन घेऊन कैलासावर आले आहेत !", माता पार्वती म्हणल्या "कोणते प्रयोजन भगवंत?", मातेच्या या प्रश्नाचे उत्तर भगवान शंकर देणार तेवढ्यात नारद मुनी भगवान शंकराला आणि माता पार्वतीला नमस्कार करत  म्हणाले, " माते भगवंत तर सर्वज्ञानी आहेत, मला काही सांगण्याची आवश्यकता नाही पण तरीही विचारतो, पृथ्वीवरील स्वर्गीय स्वर लता दीदी स्वर्गात आल्या आहेत आणि मला त्या स्वरातून शिव तांडव  स्तोत्र ऐकायची आहे. आणि लता दीदींच्या आवाजातील शिव स्तुती कधी ऐकायला मिळेल ते विचारायला भगवान शंकरा कडे आलो आहे." नारद मुनींचे वाक्य ऐकल्यावर माता पार्वती प्रश्नार्थक मुद्रेने पहात होत्या आणि भगवान शंकर त्याच स्मित हास्याने ध्यानस्त झाले होत. 

इकडे इंद्राच्या दरबारात तर वेगळीच धावपळ सुरु होती. देवांचा राजा इंद्राने सर्व अप्सरांना पुढच्या वर्षभरा करीता सक्तीच्या सुट्टीवर पाठवले होते. इंद्र दरबारात पुढील काही दिवस लता दीदींच्या संगीत मैफलीचे आयोजन करण्याचे ठरवले होते. काही देव तर आवडीचे गाणे निवडत होते. उत्तमोत्तम संगीत साथ देणाऱ्यांची सूची करण्यात येत होती. तर काही देव वाद्यांची निवड करत होते. हे सर्व होत असताना एक बैठक संतांनी सुद्धा बसवली संत ज्ञानेशवर महाराज, निवृत्ती महाराज, मुक्ता बाई , संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, गोरोबा काका, संत चोखामेळा, संत जनाबाई, समर्थ रामदास या सर्वांची बैठक बसली. या बैठकीचे प्रयोजन सुद्धा लता दीदींचे गाणे हेच होते, कोणाला लता दीदींच्या आवाजात ऐकायचे होती ज्ञानेश्वरी आणि पसायदान तर कोणाला तुकाराम महाराजांचे अभंग, कोणाला एकनाथांचे भारूड तर कोणाला नामदेव महाराज आणि गोरोबा काकांच्या रचना प्रत्येक संताला लता दीदींच्या आवाजातून काही न काही ऐकायचे होते, भगवंताचे नामस्मरण दीदींच्या स्वरात प्रत्येक संत अनुभवू पाहत होते.

संतांची बैठक होत असतानाच भगव्या ध्वजा खाली राजमाता जिजाऊ साहेब आणि शंभू राजांसोबत छत्रपती शिवाजी महाराज बसले होते, सदरे वरती खाश्या स्वाऱ्या समोर मोरोपंत पिंगळे, रामचंद्र पंत आमात्य, सरसेनापती प्रतापराव गुजर-हंबीरराव मोहिते, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजी प्रभू देशपांडे आणि अनेक मराठा मावळे उभे होते. या दरबारात माँसाहेब शिवरायांना म्हणाल्या, " शिवबा आम्ही ऐकलं आहे लता स्वर्गात आली आहे म्हणे !" राजे उत्तरले, "होय माँसाहेब", शिवाजी महाराजांनी हसत उत्तर दिले. "राजे आमची एक इच्छा आहे" माँसाहेब जमलेल्या सर्व मावळ्यांकडे पहात म्हणाल्या, "लताच्या आवाजातील 'जय देव जय देव जय जय शिवराय' ही आरती ऐकायची आहे." छत्रपती शिवाजी महाराजांनी माँसाहेबांकडे व सर्व मावळ्यांकडे पाहत फक्त "जगदंब-जगदंब" म्हटले आणि  माँसाहेबांची ही इच्छा सर्व मावळ्यांनी उचलून धरत हर हर महादेवचा जयघोष केला. बर एवढे सगळं स्वर्गात होत असताना वासुदेव बळवंत फडके पासून टिळक आगरकरा पर्यंत सर्व भारतीय स्वात्रंत्र्याचे सैनिक आणि क्रांतिकारक हे दीनानाथ मंगेशकर यांच्या कडे लता दीदींना वंदे मातरम गाण्याचा आग्रह धरून बसले होते. या वेळे पर्यंत लता दीदी स्वर्गात येऊन दुपार उलटली होती आणि दुपारच्या जेवणा नंतर सगळी मराठी सारस्वत मंडळी कट्ट्यावरती एकत्र जमली होती पुलं-सुनीता बाई, कुसुमाग्रज, भीमसेन जोशी, वसंतराव, शांता बाई शेळके एक ना अनेक नावे असलेली मराठी लेखक, कवी कवयत्री स्वर्गातल्या कट्ट्यावर जमून लता दीदींच्या मैफलीची तयारी करत होती. हार्मोनियम वर कोण बसणार, तानपुरा कोण पकडणार, तबला कोण वाजवणार, सूत्र संचालन कोण करणार अशा अनेक गोष्टींचे नियोजन ही मंडळी करत होती.

लता मंगेशकर स्वर्गात काय आल्या स्वर्गात जणू वसंत पालवीचे फुटली होती. पृथ्वी वरील अनेक पिढ्या लता दीदींच्या आवाजाने, त्यांच्या स्वराने संमोहित झाल्या होत्या आणि आता स्वर्गातील अनेक पिढ्या मंत्रमुग्ध होणार होत्या. नारद मुनीनी स्वर्गातील हा उत्साह पहिला आणि त्यांना भगवान शंकराच्या व श्री विष्णूच्या स्मित हास्याचे रहस्य कळले.

 

विराज देवडीकर

1 comment:

  1. विलक्षण कल्पनाऍ

    ReplyDelete